मोताळा : एका विवाहितेला हातवारे तथा इशारे करून विनयभंग केल्याची घटना ३० एप्रिल ते १८ मे दरम्यान नांदुरा तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेने बोराखेडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील गजानन हरी अढाव आणि फिर्यादीच्या पतीची मैत्री होती. त्यामुळे आरोपीचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे होते. फिर्यादीला पतीने मुलांच्या अभ्यासाकरिता मोबाइल घेऊन दिला. त्या मोबाइलवर ३० एप्रिल २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अढाव याने फोन करून भेटण्यासाठी बोलावले, न आल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या घरासमोर उभे राहून इशारे केले. १८ मे रोजी फोन करून भेटली नाही तर पतीला व मुलीला जिवे मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फोन करून म्हणे भेटली नाही तर पती आणि मुलीला ठार मारेन, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
