संग्रामपूर : हुंड्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तामगाव पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संग्रामपूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव येथील माहेर व संग्रामपूर येथील सासर असलेल्या सायमा फिरदोस शेख फिरोज (२३) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत विवाहितेचे नातेवाईक शेख लुकमान शेख सुलेमान (५४, रा. सीतामाता मंदिराजवळ, शेगाव) यांनी तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून वेळोवेळी हुंड्याची मागणी केली. तसेच सायमा यांचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी शेख फिरोज शेख शरीफ, शेख शरीफ शेख मनू, शेख फरजानाबी शेख शरीफ आणि शेख शाहरुख शेख शरीफ (सर्व रा. संग्रामपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, ८० व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत.