मलकापूर : घरातील सामान घेऊन निघून का गेली नाहीस, असा जाब विचारत हातात चाकू घेऊन घरात घुसलेल्या पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील सुभाषचंद्र बोस नगर परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नीच्या छातीवर, बहिणीच्या हाताच्या बोटांवर आणि मेहुण्याच्या पोटावर चाकूने वार करून तिघांना जखमी करण्यात आल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी प्रकाश रावणचवरे (वय २३, रा. सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास त्या आपल्या बहिणीसह घरी असताना आकाश साहेबराव रावणचवरे (वय २७, रा. बहापुरा, ता. मलकापूर) हा हातात चाकू घेऊन घरात घुसला. यावेळी ‘तू माझ्या घरातून सर्व सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ असे म्हणत त्याने लक्ष्मी यांच्या उजव्या छातीवर चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या. दरम्यान, लक्ष्मी यांना वाचविण्यासाठी त्यांची बहीण पुढे आली असता तिच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवरही चाकूने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्याचवेळी मेहुणे सतीश वन्हाडे हे घटनास्थळी आले असता त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून त्यांनाही जखमी करण्यात आले. यानंतर तिघांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.