खामगाव:- खामगाव तालुक्यातील उमरा अटाळी येथे शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र महादेव राऊत (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या शेतात गेले होते. शेतातील विहिरीजवळ वाढलेले गवत कापत असताना अचानक मोटार पंपाच्या वायरचा त्यांना जोरदार शॉक लागला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत राऊत यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.