मोताळा :- तालुक्यातील ब्राम्हंदा गावात १९ वर्षीय तरुण सौरभ उर्फ वैभव ईश्वर शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असताना पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे. सौरभ ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात काम करताना दिसला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी दिवसभर शोध घेतला, परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नाही. काल ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता सौरभच्या शेतातील विहिरीत त्याच्या जेवणाच्या डब्याची थैली तरंगताना आढळून आली. विहिरीत शोध घेतल्यानंतर सौरभचा मृतदेह सापडला.
या प्रकरणी ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे यांनी मोताळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे. ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश सोनवणे पुढील तपास करत आहेत. या घटनेमूळे गावात शोककळा पसरली आहे. सौरभच्या आकस्मिक मृत्यूनं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विहिरीत पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना!
