डोणगाव :- जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात शेलगाव देशमुख येथील चौघांचा मृत्यू झाला. होंडा सीटी कार (एमएच-२०-सीएस-६०४१) उभ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. यात भागवत चौरे (३८), त्यांची मुलगी सृष्टी (१४), मुलगा स्वराज (८) आणि मामी अनिता कुटे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला.भागवत चौरे आणि कुटे कुटुंब पुण्याहून सुबोध कुटे याला सोडून परतत होते. वाटेत तुळजापूर येथे देवदर्शन केले. संभाजीनगरमध्ये मामा परसराम कुटे आणि मामी अनिता कुटे यांना सोडून जालनाकडे जात असताना, महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.अपघातातील मृतदेह रात्री शेलगाव देशमुख येथे आणण्यात आले. बापलेकांना एकाच सरणावर मुखाग्नी देण्याची दुर्दैवी वेळ आजोबांवर यशवंत चौरे यांच्यावर आली. अनिता कुटे यांच्या अंत्यसंस्कार वेगळ्या सरणावर करण्यात आले. या घटनेने अख्खे गाव शोकमग्न झाले असून, अपघातामुळे गावातील चूली पेटल्या नाहीत. या घटनेतील दोघे परसराम कुटे (५५) व छाया चौरे (३५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताने चौरे आणि कुटे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उभ्या ट्रकवर कार आदळली; एकाच सरणावर तिघा बाप लेकांवर अंत्यसंस्कार, अपघातात चौघांचा मृत्यू!
