मलकापूर:- मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच काटी येथे एका ग्रामस्थावर धारदार शस्त्राने हल्ला करून एका इसमाला जागीच ठार मारल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता काठी शिवारालगत असलेल्या माकनेर गावात मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ४ ते ५ चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चोरीचा प्रयत्न उधळला गेल्याने चोरट्यांनी गावातील एका महिलेवर चाकूने हल्ला करून पलायन केले. यात महिला जखमी झाली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना चोरट्यांनी टार्गेट केले असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.