शेगाव : – खोटी माहिती देऊन विवाह करून फसवणूक केल्याचा आरोप करत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ५ मे २०२६ रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी कांचन रघुनाथ सिंग ठाकूर (वय ४९, रा. गीतेचा मळा, अकोट रोड, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी चुकीची माहिती देत त्यांच्याशी विवाह केला व त्यांची तसेच एका शासकीय अधिकाऱ्याची फसवणूक केली. विवाहानंतर आरोपींकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना १७ जुलै २०१५ ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी राकेश कुमार महेंद्र प्रताप सिंह (५३), आशादेवी महेंद्र प्रताप सिंह (७०) आणि मृदुला उर्फ प्राची दीपक सिंह (४६), सर्व रा. कादरेपूर, ता. बदलापूर, जि. जौनपूर (उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.