मेहकर :- तालुक्यातील सुकळी येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याचा तपास नव्याने मिळालेल्या धाग्यावरून पुढे सरकला. आरोपींपैकी एकाच्या पत्नीने दिलेल्या माहितीमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि पोलिसांनी पुरावे गोळा करत आरोपींपर्यंत पोहोचले. या प्रकरणी सचिन ज्ञानेश्वर उगले आणि सुनील बाजीराव जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २१) त्यांना न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकरणाचा उलगडा झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या तपासाचे कौतुकही केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.