खामगाव : तालुक्यातील चितोडा शिवारात दुचाकीचा अपघात होऊन अंबिकापूर येथील ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानदेव दगडू धुरंदर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ६ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. ज्ञानदेव धुरंदर हे शेतातील काम आटोपून दुचाकीने अंबिकापूरकडे घरी परतत होते. चितोडा शिवारातून जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर ते रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी धुरंदर यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.