Headlines

मलकापूर तालुक्यातील घिरणी येथील शेतकऱ्याच्या गाईवर जंगली जनावराचा जीवघेणा हल्ला; हल्यात गाईचा मृत्यू; बिबट्या असल्याची चर्चा

मलकापूर: रात्रभर झोपेच्या शांततेत अचानक दु:खद घटना घडली आहे… एकीकडे शेतीच्या कष्टातून मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांचे आयुष्य आधीच संकटात आहे, आणि दुसरीकडे जंगली प्राण्यांचा वाढता विळखा हे संकट आणखी गहिरे करत आहे. घिरणी परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्नासाठी जंगल सोडून बाहेर पडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याच्या उपजीविकेचा आधारच हिरावला आहे.
घिरणी येथील अरुण श्रीराम सुशीर यांच्या शेतामध्ये असलेल्या गाईला काल रात्री बिबट्याने ठार केले. ही दुर्दैवी घटना उमाळी रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जवळील त्यांच्या शेतात घडली. गाईवर हल्ला करून बिबट्याने तिला जागीच ठार केले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसह पशुपालन हे गावातील अनेक शेतकऱ्यांचे मुख्य आधार आहेत. अशा वेळी गाईसारख्या मौल्यवान जनावराची अशी हानी ही आर्थिक दृष्ट्या मोठा फटका आहे. बिबट्याची हालचाल ही गेल्या काही दिवसांपासून परिसरात जाणवली जात होती, मात्र कालच्या घटनेनंतर ही धोक्याची घंटा ठरली आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच इतर सर्व शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!