मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहराच्या राजकारणात, विकासात आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या मलकापूर शहराचे माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांना ‘राज भूषण’ हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान 10 मे रोजी नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषिमंत्री आमदार अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या गौरव प्रसंगी व्यासपीठावर उभे असताना निहलानी यांचे डोळे पाणावले होते. “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कार्याचा गौरव नाही, तर तो मलकापूरच्या जनतेने दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि विश्वासाचे प्रतीक आहे,” असे त्यांनी भरल्या आवाजात सांगितले. “माझ्या प्रत्येक निर्णयामागे, माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे मलकापूरची जनता उभी होती. म्हणूनच हा सन्मान मी संपूर्ण मलकापूरकरांना समर्पित करतो,” असे ते म्हणाले. नारायणदास निहलानी यांचे कार्य फक्त राजकीय मर्यादांपुरते सीमित नव्हते. त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सामाजिक एकोपा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात मलकापूर शहराने अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मिळवल्या, ज्याचा लाभ आजही नागरिक घेत आहेत. या पुरस्कारामुळे संपूर्ण मलकापूर शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. नागरिक, सामाजिक संस्था, आणि राजकीय नेत्यांनी निहलानी यांचे अभिनंदन करत त्यांचे योगदान पुन्हा एकदा उजळून दाखवले आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक ट्रॉफी नव्हे, तर मलकापूरच्या जनतेच्या मनातील आदर, प्रेम आणि त्यांच्या सेवेच्या उत्तरदायित्वाची कबुली आहे. नारायणदास निहलानी यांचा हा सन्मान शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात कायमचा कोरला जाईल.
मलकापूरचा अभिमान उजळला : माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांना ‘राज भूषण’ पुरस्काराने गौरव “हा सन्मान माझा नाही, मलकापूरकरांचा आहे” — निहलानी यांचा भावूक संदेश
