मलकापूर (दीपक इटणारे) – “विदर्भ लाइव्हने ” काल प्रकाशित केलेल्या ‘स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य’ या बातमीचा थेट परिणाम आज दिसून आला. नगरपरिषद प्रशासनाने कुलमखेल परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवत कचऱ्याचे ढीग हटवले. रहिवाशांनी यावेळी समाधान व्यक्त करत “माध्यमांनी आवाज उठवल्यानेच हा बदल घडला” अशी प्रतिक्रिया दिली. मंदिर परिसर, मुख्य रस्ते व नाल्याजवळ साचलेला कचरा उचलण्यात आला असून, परिसराचा काही अंशी देखावा बदललेला दिसून आला. कालपर्यंत दुर्गंधी आणि अस्वच्छतेने त्रस्त असलेल्या नागरिकांनी “हे केवळ सुरुवात आहे, कायमस्वरूपी स्वच्छता हवी” अशी मागणी केली आहे.
ही कारवाई “ विदर्भ लाईव्ह” च्या लोकहितार्थ पत्रकारितेचा ठोस परिणाम मानली जात असून, “माध्यमं जर जबाबदारीने काम करत असतील तर प्रशासन हलतं” हे पुन्हा सिद्ध झालं आहे.