मलकापूर (दिपक इटणारे): शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट होत असून, सलग तिसऱ्या दिवशीही बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात कचरा गाडी फिरकली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, मच्छर आणि रोगराईचा धोका वाढला आहे. व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित करत नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापाऱ्यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “आम्ही भरलेला कर नेमका जातो कुठे? कचरा व्यवस्थापनासाठी खासगी ठेकेदारांची नेमणूक झाली असली तरी त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. मग जबाबदारी कुणाची?” शहरातील अनेक भागांत अशीच परिस्थिती असून, प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. “स्वच्छ भारत अभियान” केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात राबवावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. नगरपालिकेने तत्काळ लक्ष घालून स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत करावी.
बुलढाणा रोडवर सलग तिसऱ्या दिवशीही कचरा गाडी गायब – व्यापाऱ्यांचा तीव्र संताप; जनतेचा पैसा सुविधांसाठी की ठेकेदाराला पोसण्यासाठी
