मलकापूर: महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मलकापूर शहर व तालुका शाखेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महायुती सरकारने सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, निवडणुकीच्या वेळी महिलांना दरमहा २१०० रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते अनुदान तत्काळ सुरू करावे, असेही निवेदनात नमूद आहे.
याशिवाय, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, रेशन कार्डधारकांना नियमित धान्य पुरवठा करावा, तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित रेशनचे पैसे जमा करावेत, अशा मागण्यांचाही समावेश करण्यात आला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शिवसेना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल आणि याला संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, शकील जमादार, कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले, किसान सेना तालुका प्रमुख महादेव पवार, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, शाम जाधव, सै. तोफिक, शेख सद्दाम, इसाक तेली यांसह अनेक शिवसैनिकांनी स्वाक्षरी केली.