मलकापूर:- शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगर येथे शांती आरोग्यम् हॉस्पिटल हे नगरपरिषदेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आले आहे. तसेच, आवश्यक नियमांची पूर्तता न करता या अवैध बांधकामाकडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ५ मार्च रोजी न.प. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवत गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे न.प. परिसरात मोठी खळबळ उडाली. चाळीसबिघा परिसरातील शांती आरोग्यम् हॉस्पिटल हे नगरपरिषदेच्या कोणत्याही परवानगीशिवाय उभारण्यात आले आहे. यासोबतच आवश्यक असलेल्या बांधकाम नियमांचे पालनही झालेले नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी वेळोवेळी न.प. प्रशासनाकडे लेखी तक्रारीसह कागदपत्रे सादर केली. तसेच, संबंधित बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, न.प. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई केली नाही.
यासंदर्भात १७ फेब्रुवारी रोजी अर्धनग्न आंदोलन करून ५ मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास गाढव मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे अखेर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाढवांच्या गळ्यात निष्क्रिय प्रशासनाच्या नावाने पाट्या लावून गाढव मोर्चा काढला. प्रभारी मुख्याधिकारी शेळके यांनी हॉस्पिटलच्या बांधकाम धारकास एक महिन्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे पत्र दिले होते. मात्र, हा कालावधी उलटल्यानंतरही न.प. प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारदाराच्या सततच्या पाठपुराव्यानंतर १५ दिवसांपूर्वी बांधकाम धारकाने खुलासा आणि मालकी हक्काचे दस्तऐवज सादर केल्याचे पत्र देण्यात आले. मात्र, यासंबंधी कोणतीही कार्यवाही झालेली नाही, तसेच चौकशी अहवालही देण्यात आलेला नाही. या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मलकापूर शहरातील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, तालुकाध्यक्ष अजीत पुंदे, उमेश जाधव, अशोक गाढवे, अर्जून पाटील, राजू पुन्हेकर, शीतल जांगडे, जमीर शेख, नसीम बानो, शमशाद खानम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.