मलकापूर : – महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक धार्मिक स्थळांवरून मोठ्या आवाजात प्रार्थना सुरू असतात. त्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण आणि गर्भवती महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी आहे. तसेच, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ५५ डेसिबलच्या मर्यादेतच आवाज ठेवण्याची अट आहे. मात्र, शहरातील धार्मिक स्थळांवर दिवसातून अनेक वेळा या मर्यादांचा भंग होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येत आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे शासनाने त्वरित कायद्याची अंमलबजावणी करावी आणि विनापरवानगी लावलेले लाऊडस्पीकर काढावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.