मलकापूर ( उमेश ईटणारे ):- शहरातील माता महाकाली नगर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना अजूनही अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पाणीपुरवठा कर्मचारी फोन उचलत नसल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.
पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजन कधी होणार?
शहरात सध्या दहा-दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र नागरिकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे अनेकदा लोक पाणी भरण्यापासून वंचित राहतात. नगरपालिकेने नियमित वेळापत्रक जाहीर करून नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
कर्मचारी फोन का उचलत नाहीत?
नागरिकांना पाणीपुरवठ्याची माहिती घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्याची गरज भासते. मात्र, हा कर्मचारी कायम ‘नॉट रिचेबल’ असतो किंवा फोन उचलत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. “आमच्या गरजेच्या वेळी जर कर्मचारी फोनच उचलत नसतील, तर त्यांच्याकडे जबाबदारी का दिली जाते?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगरपालिका यावर नियंत्रण आणणार का?
या परिस्थितीत नगरपालिका त्वरित हस्तक्षेप करणार का? पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक तयार करणार का? आणि कर्मचारी नागरिकांचे फोन उचलतील याची हमी देणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांचा रोष कायम राहील.
नगरपालिकेने लवकरात लवकर उपाययोजना करून हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.