मलकापूर ( उमेश ईटणारे ):- शहरातील माता महाकाली नगर परिसरातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा बेजबाबदारपणा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध भागांमध्ये कर्मचारी नियुक्त केले असले, तरी या कर्मचाऱ्याची कार्यपद्धती मनमानी व गैरजबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नियोजनाचा अभाव, नागरिकांना मनस्ताप
शहरात सध्या दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे पाणीपुरवठ्याचा वेळ कोणालाही ठाऊक नसतो. परिणामी, नागरिकांना अचानकच नळाला पाणी आले की धावपळ करावी लागते. कोणी बाहेर गावी असल्यास किंवा कामात व्यस्त असल्यास त्यांना पाणी मिळत नाही, तर काही जणांना कमी पाणी मिळते.
*पाणीपुरवठा कर्मचारी ‘नॉट रिचेबल’*
पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष यामुळे संतप्त नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः, या कर्मचाऱ्याचा मोबाइल कायमस्वरूपी बंद किंवा ‘नॉट रिचेबल’ राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याचा वेळ विचारण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
*उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न*
आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार आहे. त्यातच नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाढत्या तक्रारींकडे लक्ष देऊन नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ नागरिकांना कळवावी आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.