मलकापूर( दिपक इटणारे ):- विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. या रुग्णालयावर तालुक्यातील हजारो नागरिक अवलंबून आहेत. मात्र, येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टर उपस्थित नसल्याने आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रसंग ऐकून नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे, मात्र याकडे प्रशासन मुग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.
डॉक्टरांची कमतरता का?
मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाचा उदासीनपणा. तालुक्यातील जनतेसाठी हे एकमेव शासकीय रुग्णालय असूनही, येथे मूलभूत सोयीसुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी भुसावळ किंवा जळगावसारख्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे प्राण धोक्यात येतात.
प्रशासनाचा निष्काळजीपणा
डॉक्टरांची नियुक्ती होण्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. परंतु, प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणे याला प्रशासनाचा निष्काळजीपणा म्हणावे की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कायमस्वरूपी तोडगा अपेक्षित
गंभीर आजार, अपघात किंवा इतर तातडीच्या प्रकरणांसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच, रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. मात्र प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आवाज उठवणार असल्याची माहिती आहे. रुग्णांचे प्राण ही त्यांची जबाबदारी आहे, न की दुर्लक्ष करण्याचा विषय.