शेगाव:- तालुक्यातील बोंडगाव, काठोरा आणि कालवड या गावांमध्ये तीन दिवसांत ७० हून अधिक नागरिकांचे टक्कल पडल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, पिण्याच्या पाण्यातील अस्वच्छतेमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावकऱ्यांना डोक्यात खाज येणे, केस गळणे आणि टक्कल पडण्याचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावांमध्ये घबराट पसरली असून आरोग्य विभागाच्या पथकाने पाहणी करून गावकऱ्यांना शुद्ध पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हा प्रकार कोणत्याही व्हायरसचा परिणाम नसून केवळ दूषित पाण्यामुळे झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून पाण्याचा स्रोत स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.