अकोला :- बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात पूजा करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यात अन्य पाच जण जखमी झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत रेशमा पवार (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला. पूजेदरम्यान अगरबत्तीच्या धुरामुळे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला, त्यामुळे संतप्त झालेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात रेशमा पवार गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अकोल्याच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन लहान मुली, एक पुरुष आणि एक महिला असे पाच जण जखमी झाले आहेत. मृत महिलेच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.