मलकापूर :- नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील एका ४७ वर्षीय इसमाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (६ जून) सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ साहेबराव क्षिरसागर (वय ४७, रा. विटाळी, ता. नांदुरा) असे आहे. याबाबत विष्णु गजानन क्षिरसागर (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, विश्वनाथ क्षिरसागर यांनी ग्राम विटाळी शिवारातील गट क्रमांक ७७ मधील त्यांच्या शेतात बोरीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ जाधव करीत आहेत.