बावनबीर : – राज्य रेल्वे पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी मुंबई येथे गेलेल्या बावनबीर येथील अर्जुन उर्फ अक्षय तुळशीराम मसाळ (वय ३०) यांचा मैदानी चाचणीनंतर प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर भरतीची शारीरिक परीक्षा पार पडली. अक्षय यांनी १०० मीटर ते १,६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली. सकाळी सुमारे ११:३८ वाजता ते परीक्षास्थळाबाहेर पडले.
त्यानंतर काही अंतर चालल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी जवळील साई मंदिरात विश्रांती घेतली. तेथे असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. मित्रांनी तातडीने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर २५ फेब्रुवारी रोजी त्यांचे पार्थिव बावनबीर येथे आणण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
