देऊळगावराजा (खल्याळ): गव्हाण शिवारात रस्ता खचून तीन सख्खे भाऊ मलब्याखाली अडकण्याची दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत दोन भावांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र एका भावाचा मृत्यू झाला.डोलखेड येथील डोईफोडे कुटुंबातील बद्री (४०), संदीप (३८), आणि दिलीप (३२) हे तीन भाऊ खल्याळ गव्हाण ते सिनगाव जहागीर रस्त्यावर शेतसिंचनासाठी पाईपलाईनच्या लिकेजमध्ये छडी टाकण्याचे काम करत होते. या ठिकाणी लिकेजमुळे जमीन ओली होऊन कमजोर झाली होती. काम सुरू असताना अचानक रस्त्याचा भाग खचला आणि तिघे भाऊ मलब्याखाली दबले.घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या मदतीने बद्री आणि संदीप यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र दिलीप यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.दिलीप यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. अक्षय गुठे आणि डॉ. विलास दराडे यांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी बद्री यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले.
दरम्यान, मदत कार्यादरम्यान जेसीबीच्या बकेटचा फटका दिलीप यांच्या डोक्याला लागून त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याची चर्चा आहे. या दुर्दैवी घटनेमुळे डोलखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.