मलकापूर: इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) आयईआय ही भारतातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक बहुविषयक व्यावसायिक अभियांत्रिकी संस्था आहे. ही संस्था 1920 साली स्थापन झाली असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. गेल्या शतकामध्ये, आयईआय ने अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतभर 124 केंद्रे, 6 परदेशी अध्याय, 7 विशेष मंचे, आणि 15 अभियांत्रिकी शाखांचा समावेश असलेल्या या संस्थेचे १ मिलियन हून अधिक अधिक व्यावसायिक सदस्य आहेत, ज्यामुळे जागतिक अभियांत्रिकी समुदायात संस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) आयईआय त्यांच्या फेलो सदस्यांपैकी 15 प्रमुख अभियांत्रिकी शाखांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य असलेल्या अत्यंत पात्र आणि अनुभवी लवादकांचा पॅनेल राखते. हे सदस्य भारतभर 124 राज्य आणि स्थानिक केंद्रांशी संलग्न आहेत. आयईआय तर्फे दरवर्षी शैक्षणिक, तांत्रिक आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना ‘इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ दिला जातो. हा पुरस्कार शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योग-शिक्षण समन्वय, विद्यार्थ्यांचा विकास, आणि समाजासाठी योगदान या निकषांवर आधारित दिला जातो.
हा पुरस्कार संस्थेच्या गुणवत्तेची पावती असून, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देतो. या वर्षी या अवार्ड चे आयोजन कोलकाता येथील नोवोटेल हॉटेल येथे करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर यांना हा सन्मान मिळाल्याने संस्थेने तांत्रिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. कोलकात्यात आयोजित शानदार सोहळ्यात आयईआय (आयईआय – इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया) तर्फे ‘इंजीनिअरिंग एक्सलंस अवार्ड’ आयईआय चे प्रेसिडंट डॉ. जी. रंगनाथ यांच्या हस्ते व इतर आयईआय चे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळणे म्हणजे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी केलेल्या भरीव योगदानाची पावती आहे.
कोलते महाविद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि पॉलिटेक्निक चे प्रमुख प्रा. संदीप खाचणे उपस्थित होते. या सन्मानाने संस्थेचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले असून मलकापूर शहराचा अभिमान वाढला आहे.पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते. संस्थेने स्थापनेपासून आजपर्यंत शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात उच्च दर्जा राखण्याचे काम केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, उद्योगांसोबत सहयोग, नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचा कायमच अग्रक्रम राहिला आहे.विद्यार्थ्यांनी प्रादेशिक तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये केलेली कामगिरी, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचा सामूहिक प्रयत्न यामुळेच संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे.
हा सन्मान केवळ संस्थेचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा, कर्मचारी वर्गाचा आणि माजी विद्यार्थ्यांचा संयुक्त विजय आहे. संस्थेतील प्रत्येक सदस्याच्या योगदानामुळेच हा मान मिळवता आला आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी केले. प्रा. संदीप खाचणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिटेक्निक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणारे अथक प्रयत्न यामध्ये निर्णायक ठरले आहेत.
हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यात आम्हाला जागतिक स्तरावर गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीत प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे, तांत्रिक कौशल्यांचा विकास करणे, आणि समाजोपयोगी योगदान देणारे अभियंते घडवणे यावर भर दिला जाईल. असे वक्तव्य महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील, उपाख्य नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदिपभाऊ कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांनी केले.