मलकापूर:- दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होताच तालुक्यातील डी.ई.एस. हायस्कूल, दाताळा येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी संवाद सत्र आयोजित करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी या विशेष सत्राद्वारे विद्यार्थ्यांना भयमुक्त, तणावरहित आणि आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे मार्गदर्शन केले. शालेय प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रेरणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. मार्गदर्शन करताना संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकडे केवळ गुणांसाठी पाहू नका, तर ज्ञान संपादन आणि भविष्य घडवण्याच्या संधीसारखे बघा, असा मोलाचा सल्ला दिला. “परीक्षा ही महत्त्वाची असली, तरी तीच आयुष्य ठरवणारी नाही. निकाल काहीही लागला तरी खचून जाऊ नका, आत्मविश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले. याशिवाय, परीक्षा काळात अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक नियोजन केले असून पालकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, असेही त्यांनी सांगितले. शालेय व्यवस्थापनानेही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्याच्या अभ्यासाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा दिली. एकूणच, या संवाद सत्रामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळून आत्मविश्वास वृद्धिंगत झाला, असे चित्र दिसून आले.