मलकापूर (देवधाबा):- ज्याच्या घामातून पीक उगवतं, त्याच्या स्वप्नांना आगीचा झटका बसतो, तेव्हा नुसता धूर उडत नाही, तर मनही होरपळून निघतं.
दि. 5 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वीज वादळी वाऱ्यामुळे देवधाबा शिवारातील गट क्रमांक 355 मध्ये असलेल्या शेतकरी नारायण रघुनाथ बोरसे यांच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत गोदामात साठवलेला तुर, गहू, तुरीचे कुटार, दोन पंप फवारणी व इतर शेतीसाहित्य पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. वर्षभर कष्ट करून साठवलेला माल एका रात्रीच्या वादळात भस्मसात झाल्याने बोरसे कुटुंबाचे आर्थिक कंबरडं मोडलं आहे.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे आगीचा फैलाव वेगाने झाला. प्रशासनाकडून पंचनाम्याची कार्यवाही सुरू असून, बोरसे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी यांनी केली आहे.
वादळाच्या झटक्यात बोरसे कुटुंबाचे 3 लाखांचे नुकसान; वर्षभराचा शेतमाल आगीत खाक
