Headlines

आई-वडिलांच्या छत्राशिवाय वाढलेला चिमुकला काळाच्या पडद्याआड, खडकपूर्णा कालव्यात बुडून पाचवीतील विद्यार्थ्याचा हृदयद्रावक मृत्यू; आजीचा आक्रोश पाहून गाव सुन्न

अंढेरा :- आधीच आई-वडिलांचे छत्र हरवलेले आयुष्य… आजीच्या कुशीत वाढणारे बालपण… आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत गेलेला निरागस जीव कायमचा निघून गेला. अंचरवाडी येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या स्वराज गणेश खरात या पाचवीतील विद्यार्थ्याचा खडकपूर्णा कालव्यात बुडून झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला सुन्न करून गेला आहे.
कलोरा येथील स्वराज हा लहान वयातच आई-वडिलांना मुकला होता. त्याचा सांभाळ त्याची आजी करत होती. आपल्या नातवाच्या शिक्षणासाठी तिने त्याला अंचरवाडी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये दाखल केले होते. तो शासकीय वसतिगृहात राहत होता. आयुष्यातील संघर्ष असूनही स्वराज अभ्यासू आणि शांत स्वभावाचा असल्याचे शिक्षकांनी सांगितले. १५ फेब्रुवारी रोजी रविवारची सुट्टी असल्याने दुपारी सुमारे १२ वाजता स्वराज काही मित्रांसोबत खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेला. तीन मुलांनी पाण्यात उड्या घेतल्या. दोघांना पोहता येत असल्याने ते सुखरूप बाहेर आले. मात्र स्वराजला पोहता येत नव्हते. क्षणात तो खोल पाण्यात बुडाला… आणि आनंदाचा क्षण दुर्दैवात बदलला. तेथे उपस्थित महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. अनेकांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र बराच वेळ तो सापडला नाही. अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. अखेर काही अंतरावर स्वराजचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
ही बातमी कळताच स्वराजची आजी घटनास्थळी पोहोचली. आपल्या लेकराला हाक मारत केलेला तिचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “माझ्या नातवाला शिकवून मोठं करायचं होतं…” असे म्हणत ती वारंवार बेशुद्ध पडत होती. गावकऱ्यांनाही हा आघात सहन होत नव्हता.
नातेवाईक व गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वसतिगृह प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी कुठे जातात, यावर कोणतीही नियंत्रण व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.
पंचनामा करून स्वराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात एक भाऊ असून तो आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आई-वडिलांनंतर आता नातवाचाही आधार हरपल्याने आजीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निरागस जीवाच्या अकाली जाण्याने अंचरवाडी परिसर शोकसागरात बुडाला असून खडकपूर्णा कालव्याच्या काठावर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!