मोताळा :- तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील रामेश्वर विश्वनाथ राहणे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामेश्वर राहणे यांची सहा एकर शेती गट क्रमांक १९८ व १९९ मध्ये आहे. मात्र, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचा खर्चही न निघाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक, को-ऑपरेटिव्ह बँक आणि पान्हेरा ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे ४-५ लाखांचे कर्ज असल्याचे कुटूंबीयांनी सांगितले. १४ जानेवारी रोजी त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे राहणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या हा गंभीर प्रश्न बनला असून प्रशासनाने त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.