मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रणथम येथे भरधाव अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला असून ऑटोचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी सहाच्या सुमारास घडली. कुलमखेल येथील रहिवासी राजू उर्फ राजेश रमेश चौथे (५४) हे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या एमएच २८ एन ५२५० या ऑटोरिक्षाने चिखली रणथम बाजारासाठी निघाले होते. मात्र, तांदुळवाडी फाट्यानजीक मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे ऑटो रिक्षा पलटी झाली आणि भाजीपाला रस्त्यावर विखुरला. धक्क्याने राजू चौथे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोचालक गणेश भगवान खर्चे (४८, रा. अनुराबाद) यांच्या हाताला आणि पायाला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत धडक देणारे वाहन फरार झाले होते. मलकापूर पोलीस अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेत असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कोळासे करीत आहेत.