मलकापूर( दिपक इटणारे ): छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मलकापूर शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि गगनभेदी जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. हजारो शिवभक्तांनी भगवे ध्वज हाती घेत “जय भवानी, जय शिवराय!” च्या गर्जनेत संपूर्ण शहर शिवमय केले. पराक्रमी इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी, शौर्यप्रदर्शनाने आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांनी शिवजयंती उत्सवात भारावलेली ऊर्जा अनुभवायला मिळाली.
शिवप्रतिमेला अभिवादनाने उत्सवाला सुरुवात
सकाळी ७ वाजता आई तुळजाभवानी फाउंडेशनच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी नगर येथील मंदिरात भवानी मातेचे पूजन व शिवप्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार चैनसुख संचेती, राजेंद्र वाडेकर, अशांतभाई वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मोटारसायकल रॅलीने शहरात शिवजागर!
सकाळी १० वाजता गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून निघालेल्या भव्य मोटारसायकल रॅलीने संपूर्ण शहर शिवमय झाले. भगवे ध्वज फडकवत, गगनभेदी घोषणांनी शिवभक्तांनी मलकापूर नगरी दणाणून सोडली.
शोभायात्रेत शिवकालीन इतिहासाचे सजीव दर्शन!
दुपारी ४ वाजता हनुमान चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक चित्ररथांनी शिवरायांचा इतिहास जिवंत केला. पारंपरिक क्रीडा प्रकार, तलवारबाजी, लाठी-काठी यांचे थरारक सादरीकरण झाले. लेझीम पथकांच्या तालावर उपस्थितांनी जल्लोष केला.
लेझीम स्पर्धेत ‘माता महाकाली’ पथक प्रथम!
पारंपरिक लेझीम स्पर्धेत माता महाकाली लेझीम पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. यशवंत लेझीम पथक दुसऱ्या तर दुर्गा नगर लेझीम पथक तिसऱ्या स्थानावर राहिले.
शिवमय मलकापूर – विद्युत रोषणाई आणि भगव्यांचा सागर!
शहरातील रस्त्यांवर शिवरायांना मानवंदना देणारे बॅनर, विद्युत रोषणाई आणि भगवे ध्वज यामुळे उत्सवाचे तेज अधिकच वाढले. प्रत्येक चौकात शिवरायांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारे देखावे लावण्यात आले होते.
“हा उत्साह वर्षानुवर्षे असाच वाढत राहो!”
उत्सव समितीचे प्रमुख शिवराज जाधव म्हणाले, “मलकापूरकरांचा शिवप्रेमी उत्साह पाहून समाधान वाटते. हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य करण्याचा संकल्प आहे!”
“शिवरायांचे विचार जपू, महाराष्ट्र घडवू!”
मलकापूर शिवजयंती उत्सवाने यंदाही ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत उत्सवाची नवी उंची गाठली! शिवभक्तांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद शिवरायांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देतो.