Headlines

गोपालकृष्ण नगरातील रस्त्यांची दुर्दशा; उघड्या आसऱ्यामुळे अपघात, अपघातात चिमुकली जखमी, नागरिक संतप्त!

 

मलकापूर :- ( उमेश इटणारे ) शहरातील गोपालकृष्ण नगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे नव्हेच, तर उखडलेल्या व सतत उघड्या पडलेल्या जलनिस्सारणाच्या आसाऱ्यांमुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच अक्षम्य दुर्लक्षामुळे आज (९ मे) संध्याकाळी एका शिक्षकाच्या मुलीला दुखापत होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिक्षक काकडे हे आपल्या अवघ्या नववर्षीय मुलीला दुचाकीवरून घरी आणत असताना त्यांच्या दुचाकीला उघड्या आसाऱ्याचा फटका बसला. इतका की गाडीचा डिश थेट आसारीत अडकला आणि वळसा घेत पडझड झाली. दुचाकी सावधपणे चालवूनही काकडे यांचा तोल सुटला आणि गाडीवरून पडताना मुलीच्या पायाला व डोळ्याला दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी शिक्षक काकडे व त्यांच्या मुलीला तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी मलकापूर नगरपरिषद अभियंता मिलिंद ठोंबरे यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून धारेवर धरले. अनेक वर्षांच्या तक्रारी असूनही नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीच ठोस कारवाई न केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर अभियंता ठोंबरे यांनी “चार-पाच दिवसांत काम सुरू करू” असे आश्वासन दिले, त्यानंतरच संतप्त नागरिक शांत झाले.गोपालकृष्ण नगर परिसरातील रस्त्यांची स्थिती ही प्रशासनाच्या बेफिकिरीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर यापुढेही असे अपघात आणि संताप वाढतच जातील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!