मलकापूर – “स्वच्छ भारत, सुंदर भारत” ही केंद्र सरकारची घोषणा प्रत्यक्षात केवळ पोस्टर आणि भाषणांपुरती मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र मलकापूर शहरातील कुलमखेल परिसरात पाहायला मिळत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्थानिकांचे जीवनमान थेट धोक्यात आले आहे.
दररोज सडलेल्या अन्नपदार्थांचा वास, प्लास्टिकच्या पिशव्या, औषधींचा कचरा आणि नाल्यांतील साचलेली घाण यामुळे डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग यासारखे आजार पसरू लागले आहेत. एवढ्यावरच न थांबता, याच परिसरात संत गजानन महाराजांचे मंदिरही आहे, जिथे शेकडो भाविक दररोज दर्शनासाठी येतात. या पवित्र स्थळी जाण्यासाठी नागरिकांना घाणीच्या ढिगाऱ्यांतून वाट काढावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत गप्प बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “स्वच्छता सर्वेक्षण”साठी सजावट, झेंडे आणि फलक लावले जातात, पण प्रत्यक्षात शहरातील अंतर्गत वस्त्यांकडे साफसफाईसाठी कोणी फिरकतही नाही.
“स्वच्छ भारत”चे स्वप्न खरेच होत असेल तर कुलमखेलसारख्या भागात का पसरतेय घाण? का प्रशासन केवळ मुख्य चौकापुरतेच आपले काम मर्यादित ठेवते? नागरिक आता थेट प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “आम्हाला झेंडे नकोत, फक्त स्वच्छ रस्ते हवेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक रहिवाशांनी दिली.