मलकापूर ( उमेश ईटणारे ):- राज्यभरात थंडीने कहर केला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पूर्व प्राथमिक (नर्सरी) ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतरच भरवण्याचे आदेश राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना देण्यात आले आहेत. यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी करून आदेशाचे पालन करण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही, याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शिक्षण विभागाने शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी काही शाळांमध्ये होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळा सकाळी नऊ वाजता न भरता त्यापूर्वीच सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना थंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: शाळेच्या ड्रेस कोडमुळे लहान मुलांना हाफ पॅन्ट घालून शाळेत जाणे भाग पडत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढत आहे.