मलकापूर : शहरात चोऱ्यांच्या घटनांनी उग्र स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.17 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आदर्शनगर भागात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनाचा स्टेपनी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला कारण गाडीच्या नटावर चोरट्याने लावलेला पाना बसला नाही. यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरम्यान, आदर्शनगर भागात याआधीही अनेक गंभीर चोरीच्या घटना घडल्या आहेत. या भागात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे ‘चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मलकापूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.