आळंद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्राम आळंद येथे तरुणांच्या पुढाकारातून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाला फाटा देत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही युवकांनी टाळ वाद्य वाजवत दिंडीला पारंपरिक स्वरूप दिले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत तरुणांचे कौतुक केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजात संस्कार, शिस्त आणि परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने डीजे न लावता साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.
