महाराष्ट्र :- शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय समाविष्ट करून अध्यापनाकरीता कृषी शिक्षक पद निर्माण करून कृषी पदविका, पदवीधर व पव्युत्तर पदवी (सर्व कृषीच्या शाखा) यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मनीष मानकर (कृषी प्राध्यापक) आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लहाने यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. अंबादास दानवे यांना मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे केली.
कृषी विषय शालेय अभ्यासक्रमात चालू केल्यास विद्यार्थ्यांमधील शेती विषयक अज्ञान दूर करणे, रोजगार निर्माण करणे हा मूळ हेतू आहे. परंतु आजपर्यंत झालेल्या कृषी मंत्री यांनी फक्त घोषणाच केल्या आहेत. तर याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न कृषी विद्यार्थ्यांना पडला आहे. भारतातील राजस्थान, छत्तासगढ या राज्यांनी कृषी विषयक अभ्यासक्रम शालेय शिक्षणात आधीच त्यांच्या राज्यात लागू केला आहे. तसेच दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात देखील लवकरच कृषी विषय शालेय शिक्षणात समाविष्ट होत आहे. मग प्रगतशील, पुरोगामी महाराष्ट्र का लागू करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषीच्या विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे व्यापक ज्ञान असल्यामुळे कृषी विषय शालेय शिक्षणात लवकरात लवकर समाविष्ट करून, तो विषय शिकवण्यासाठी कृषी पदविका, पदवीधर व पदव्युत्तर पदवी (सर्व कृषी शाखा) यांचीच नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून हजारो कृषी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट होऊन कृषी शिक्षक पद निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा सुटेल. तसेच शेतीचे तांत्रिक, शास्त्रशुद्ध शिक्षण ही दिले जाईल. तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी श्री. अंबादास दानवे साहेब विरोधी पक्ष नेता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.