मलकापूर ( दिपक इटणारे ) – शहराच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या पोलीस गस्तीमधून खरंतर नागरिकांना दिलासा मिळायला हवा होता. मात्र आज बुलढाणा रोडवर गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने जे वागणे दाखवले, त्यावरून हे स्पष्ट झाले की गस्तीच्या नावाखाली केवळ सामान्यांवर धाक दाखवायचा आणि मोठ्यांपुढे गुपचूप नतमस्तक व्हायचं, हाच खरा हेतू आहे काय?
गस्तीच्या वेळी एका दुकानासमोर लावलेली दुचाकी पाहून, संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ओरडून साऱ्या परिसरात वातावरण तणावपूर्ण केलं. दुचाकी मालक धावत आला, दुचाकी बाजूला केली, पण त्याच्यावर आरडाओरडा सुरूच. आणि हे सगळं करत असताना अगदी काही पावले पुढेच खासगी प्रवासी बसेस रस्त्यावर अडथळा ठरवत उभ्या होत्या, पण तिकडे डोळा उचलूनही पाहण्याची हिंमत या गस्तीतील अधिकाऱ्यांची झाली नाही!
*दुचाकीवर करडे, बसवर धृतराष्ट्राचे सॉंग– हीच का गस्त?*
या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. काहींनी थेट सवालच केला – “गस्तीचा हेतू काय? सामान्यांवर करडी कारवाई करून फक्त दिखावा करायचा आणि रसदपुरवठा करणाऱ्या मोठ्या लोकांसमोर गप्प बसायचं का?”
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी घेतलेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यांनी स्वतः पायी गस्त घालून पोलीस दलात एक नवा संदेश दिला आहे. मात्र त्यांच्या काही अधिनस्थ अधिकाऱ्यांनी ही जबाबदारीही “दिखावा आणि आदेशपालन” म्हणून घेतली असल्याचं चित्र आज स्पष्ट झालं.
*दरमहा लक्ष्मी दर्शनामुळे तर खाजगी बस रोडवर दिसली नाही ना ?*
लोकांच्या चर्चेत एक वाक्य विशेष गाजलं – “गस्त करताय की दरमहा लक्ष्मी दर्शनासाठी फिरताय?”
हा उपरोध इतका परिणामकारक आहे की तो पोलीस खात्याच्या गाभ्यावर बोट ठेवणारा आहे. कारण एखाद्याच्या दुचाकीवर रौद्र रूप दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला, खासगी बस चालकांपुढे नतमस्तक का व्हावं लागतं, हाच मोठा सवाल आहे.
*नि:पक्ष कारवाई नसेल तर विश्वासही उडेल*
पोलीस दलात पारदर्शकता, नीतिमत्ता आणि निष्पक्षता ही मूलतत्त्वं आहेत. जर तीच डळमळीत झाली, तर नागरिकांचा पोलीस व्यवस्थेवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच, आजच्या या घटनेत गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्याने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शहरात विश्वास निर्माण व्हावा, तर गस्तीवर खऱ्या अर्थाने पारदर्शक व निःपक्ष अधिकारी असणं अत्यावश्यक आहे. निरीक्षक गणेश गिरी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून, अशा ढोंगी गस्तीमुळे मलिन होणाऱ्या पोलिस खात्याच्या प्रतिमेचे रक्षण करावे, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.