मलकापूर :- शांती आरोग्यम् हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर चार महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर आज अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर पुंजून निषेध आंदोलन छेडले. ‘चालढकल’ धोरण स्वीकारून अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या न.प. प्रशासनाचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. या अनोख्या आंदोलनाची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली.
दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी शांती आरोग्यम् हॉस्पिटलच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची तक्रार न.प. मुख्याधिकारी व मंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर न.प.चे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी हॉस्पिटलचे डॉ. विकेश जैन यांना बांधकाम एक महिन्यात जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा फौजदारी स्वरूपात कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, चार महिने उलटूनही संबंधित बांधकाम जैसे थे आहे. या प्रकरणात न.प. प्रशासन हे संबंधित बांधकाम धारकास पाठीशी घालत असल्याचा आरोप अजय टप यांनी केला होता. तसेच, ३० एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास ‘घागर पुंजण्याचे’ आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी याआधी दिला होता. अखेर आज त्यांनी ती चेतावणी प्रत्यक्षात उतरवत आंदोलनाची दिशा ठरवली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केलेल्या या आंदोलनाने न.प.च्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.