मलकापूर ( दिपक इटणारे ) : मलकापूर शहरामध्ये शांततेचे वातावरण कायम राहावे म्हणून सर्वसामान्य नागरिक राबत असताना काही बुलेट चालक मात्र सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे सायलेन्सर बसवून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत हे बुलेटचालक धुमाकूळ घालत असून त्यांच्या दणदणाटाने व्यापारी, नागरिक, आजारी रुग्ण, वयोवृद्ध आणि लहान चिमुकली देखील त्रस्त झाली आहेत. स्वतःची दादागिरी दाखवण्यासाठी आणि गावात “आमचाच दबदबा आहे” असा आव आणण्यासाठी हे बुलेटचालक बिनधास्तपणे फटाके फोडत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे बुलेटचालक म्हणजे समाजाला नकोसे झालेले, “वाया गेलेल्या बापाची पोरं” आहेत.
शहरातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की बुलढाणा रोडसह इतर भागांत या बुलेटचालकांचा त्रास असह्य बनला आहे. व्यापाऱ्यांचा व्यापार बिघडतो आहे, ग्राहकांना दुकानात उभं राहणंही कठीण होत आहे. काही घरांमध्ये नुकतेच बाळ जन्माला आले असून, या बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजामुळे ती बाळं घाबरून रडतात. वयोवृद्ध नागरिकांना या आवाजामुळे डोकेदुखी व बेचैनी निर्माण होते. रात्री उशिरापर्यंत ही दहशत सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. एकूणच समाजाच्या प्रत्येक घटकाला या बुलेटचालकांच्या उपद्रवामुळे हाल सोसावे लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर मलकापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की “कोणत्याही नागरिकाला बुलेट चालकांमुळे त्रास होत असेल तर त्या गाडीचा नंबर किंवा फोटो माझ्या व्हॉट्सअॅपवर पाठवा. पाठवणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. आम्ही अशा बुलेटचालकांना घरून उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई करू. त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर जप्त करून कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल.”
