मलकापूर ( उमेश इटणारे ) – शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांच्या त्रासात वाढच होत आहे. वेळेवर पाणीपुरवठा न होणे, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाणी सोडण्याची पद्धत यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. नगरपालिकेने वाकोडी ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
वाकोडी ग्रामपंचायतीप्रमाणे नियोजन का नाही?
वाकोडी ग्रामपंचायत दर चार दिवसांनी नियोजनबद्ध पाणीपुरवठा करते आणि त्याच्या आधी नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. यामुळे तेथील नागरिकांना कोणतीही गैरसोय होत नाही. मात्र, नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मलकापूरच्या नागरिकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कायम..
शहरातील पाणीपुरवठा कर्मचारी नागरिकांचे फोन उचलत नाहीत.
पाणी कधी येणार याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. नागरिक अडचणीत असूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.
नगरपालिका जागे होणार का?
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी वाकोडी ग्रामपंचायतीसारखे नियोजन होणे आवश्यक आहे.एसएमएस किंवा अन्य माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठ्याची वेळ सांगितली गेली पाहिजे.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. नगरपालिका यावर ठोस पावले उचलणार की नागरिकांचे हाल सुरूच राहणार? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.