भेंडवळ (ता. जळगाव जा : – तालुक्यातील भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आणि शेतकरी, राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरणारी अक्षय तृतीयेची घटमांडणी ३० एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. यामध्ये वर्षभरात होणाऱ्या पर्जन्यमान, पीक स्थिती, देशातील संरक्षण व राजकीय घडामोडी याबाबत अंदाज वर्तवला जातो. संपूर्ण प्रथेची सुरुवात श्री चंद्रभान महाराज वाघ यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी ही परंपरा अखंडितपणे पुढे चालू ठेवली आहे. या घटमांडणीमधून वाघ कुटुंबीय दरवर्षी सूर्योदयापूर्वी वर्षभरातील विविध क्षेत्रातील भाकिते जाहीर करतात. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून या अंदाजांमध्ये पावसाचे प्रमाण व कृषीविषयक माहिती बऱ्याच अंशी अचूक ठरत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. परिणामी शेतकरी वर्ग, कृषी व्यावसायिक आणि राजकीय नेतेसुद्धा ही मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भेंडवळ मध्ये उपस्थित राहतात.