वृत्तसेवा
खामगाव : पोटच्या दोन चिमुरड्यांना कमरेला बांधून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने तालुक्यातील पिंप्री गवळी शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने कोणत्या कारणामुळे हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
दहिगाव गावंडे जिल्हा अकोला येथील सौ. पार्वती प्रकाश इंगळे वय ३० ही विवाहिता आपल्या दोन मुलांसह पतीपासून विभक्त राहत होती. त्यामुळे ती माहेरी पिंप्री गवळी तालुका खामगाव येथे आर्यन वय आठ वर्ष
व मुलगी प्राची वय पाच वर्ष यांच्यासह काही दिवसापासून राहत होती. २६ ऑगस्ट रोजी दुपारी काही नागरिकांना पाझर तलावाजवळ दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एका महिलेसह तिघांचे प्रेत पाण्यावर तरंगत त्यांना कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती खामगाव ग्रामीण पोस्टेला कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन मुलांना कमरेला बांधून एका महिलेचे प्रेत
पाण्याबाहेर काढून ओळख पटविण्याचे आवाहन केले असता सदर महिला ही पार्वती वय तीस वर्षे, मुलगा आर्यन वय आठ वर्षे व मुलगी प्राची वय पाच वर्ष असे असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत सदर महिलेचे वडील मुरलीधर गुंडू खंडारे वय ५२ राहणार पिंप्री गवळी यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १९४ भारतीय न्याय दंड संहितेनुसा मर्ग दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.