मलकापूर (दिपक इटणारे ) –रात्रभर मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणारा, नोकरीसाठी शेकडो ठिकाणी अर्ज करणारा, घरच्यांसाठी स्वतःच्या हौशीला बाजूला ठेवून संसाराची स्वप्नं उराशी बाळगणारा एक तरुण… आज त्याच्या हाती पदवी आहे, नोकरी आहे, सुसंस्कार आहेत, पण तरीही त्याचं लग्न जमत नाहीय. कारण त्याच्याकडून अपेक्षा आहेत – फक्त लग्नासाठी नव्हे, तर स्वप्नाच्या पलीकडल्या गोष्टींसाठी!
एकेकाळी वधू-वराच्या मिटींगमध्ये स्वभाव जुळतो का हे विचारलं जायचं. आता फक्त स्थायिक नोकरी, स्वतःचं घर, गाडी, मोठा पगार, आणि इतर “सोयी” तपासल्या जातात. जणू काही लग्नासाठी नवरा नको, तर ‘पॅकेज’ पाहिजे. या अति अपेक्षांच्या विळख्यात आज अनेक तरुण गुदमरत आहेत. वयाच्या पंचविशीत असतानाच “तू अजून स्थिर का नाहीस?” असा प्रश्न ऐकावा लागणं, हे एका पिढीचं मानसिक आरोग्य धोक्यात घालणारं वास्तव बनलं आहे. या असंतुलित अपेक्षांमुळे आज अनेक सुशिक्षित तरुण नैराश्याच्या वाटेवर चालत आहेत. कोण व्यसनाच्या गर्तेत अडकतोय, तर कोण आत्मक्लेशात बुडालाय. एकटी जिवनसंघर्षात लढणारी ही तरुणाई फक्त एकच साद घालत आहे – “मुलगी द्या हो, मुलगी…”
समाजाने आत्मपरीक्षण करायला हवं. स्वप्नांची पूर्तता वेळ घेते. तरुणांच्या कर्तृत्वाला संधी द्या, त्यांच्या मेहनतीला साथ द्या. लग्न म्हणजे केवळ वरमाला नाही, तर दोन कुटुंबांची आणि दोन मनांची साथ असते. आईवडिलांनी आपल्या मुलींचं भविष्य पाहणं गरजेचं आहे, पण त्यासाठी समोरच्या व्यक्तीचं माणूसपणही ओळखणं तितकंच महत्त्वाचं.
आज गरज आहे, अपेक्षांची आणि वास्तवाची समजूत घालणाऱ्या संवादाची… नाहीतर उद्या, हाच समाज एका हरवलेल्या पिढीकडे पाहून पुन्हा म्हणेल – “छान पोरगं होतं, पण लग्न काही जमलं नाही!”