मलकापूर – जळगाव जिल्ह्यातील सुंदर मोती नगर येथे अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २३ वर्षीय उच्चशिक्षित मयुरी गौरव ठोसर हिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे समाजमन सुन्न झाले असून, तिची आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेली हत्या असल्याचा ठाम आरोप करण्यात आला आहे.
माळवी सोनार समाज, मलकापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आरोपी पती गौरव ठोसर, गणेश किशोर ठोसर, किशोर ठोसर, लता किशोर ठोसर यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करावी व एकाही आरोपीस जामीन मंजूर करू नये. तसेच अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विशेष जनजागृती मोहिम राबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माळवी सोनार समाज मलकापूरचे अध्यक्ष सुभाष शंकर ठोसर व सचिव मनोहर मुरलीधर रत्नपारखी यांच्यासह शेकडो सोनार समाजातील महिला व पुरुषांच्या स्वाक्षरी आहे.