मलकापूर,( उमेश ईटणारे ) दि. 23 डिसेंबर 2024: मलकापूर तालुक्यात 26 मे 2024 रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घिर्णी भाग 1 येथील मनोहर शंकर वाघमारे यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहे. वडाचे मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत तीन गुरांचा मृत्यू झाला, तर मनोहर वाघमारे व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले. घरातील सर्व साहित्यही पूर्णपणे निकामी झाले.
70 हजारांचे नुकसान, पण मदतीचा पत्ता नाही!
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन गुरांची किंमत अंदाजे 70 हजार रुपयांपर्यंत होती. घरातील टीव्ही, फ्रिज, पंखा यांसह इतर सर्व साहित्याचे नुकसान झाले. गंभीर जखमी झाल्यामुळे वाघमारे दाम्पत्य कोणतेच काम करू शकत नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट ओढवले आहे.
पंचनामा केला पण मदत गायब..
वादळाच्या थोड्याच दिवसात शासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरच मदत मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप मदतीची कुठलीच रक्कम कुटुंबाच्या हातात आली नाही.
तहसील कार्यालयात फक्त आश्वासनांची खैरात..
वाघमारे यांच्या मुलाने तहसील कार्यालयात वारंवार विनंती केली, मात्र सरकारी प्रक्रियेमुळे वेळ लागेल असे सांगत त्याला परत पाठवले गेले. “सरकारी काम आहे, वेळ लागेल,” या उत्तराशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही.
कुटुंब आर्थिक संकटात..
या वादळी वाऱ्यामुळे आधीच होरपळून निघालेल्या वाघमारे कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. जखमी दाम्पत्य काम करू शकत नसल्याने कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे.
तत्काळ मदतीची गरज..
शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा वाघमारे कुटुंब व्यक्त करत आहे. “आम्हाला लवकर मदत मिळाली तरच आम्ही उभे राहू शकतो. सहा महिने झाले, पण काहीच नाही,” असे वाघमारे म्हणाले.
शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.