चिखली : एका आनंदी प्रवासाचे दुःखद शेवट! रस्त्यावरचा एक क्षणाचा हलगर्जीपणा अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला ठरला. चिखली-मेहकर रोडवरील खैरव फाट्याजवळ ४ जून रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात पती, पत्नी आणि त्यांचा अल्लड बालक जागीच मृत्युमुखी पडले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाही तुटल्या.
खैरव फाटा ते मुंगसरी फाटा दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास मालवाहू ट्रक, डस्टर कार (क्र. एमएच ०४ जीई ५५०८) आणि प्लॅटिना मोटारसायकल यांच्यात तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड (वय ४५), त्यांची पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड (वय ४०) आणि मुलगा कृष्णा गणेश गायकवाड (वय १५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.बअपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. गणेश गायकवाड हे गंभीर जखमी अवस्थेत होते, मात्र त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात अतिवेग, चुकीचा ओव्हरटेक किंवा चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण घाटनांद्रा गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवाच्या धक्क्याने उसवलेले कुटुंब – चिखली-मेहकर रस्त्यावर एकाच अपघातात पती – पत्नीसह मुलाचा मृत्यू
