मलकापूर ( दिपक इटणारे ):- जेव्हा कधी पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर कडक शिस्त, आदेश आणि कधी कधी उद्धट वर्तनाचं चित्र उभं राहतं. परंतु मलकापूर शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या साध्या पण हृदयस्पर्शी वागणुकीने नागरिकांच्या मनातील हा गैरसमज क्षणात दूर केला. रस्त्यावर धावत बस पकडण्यासाठी झगडणाऱ्या एका छोट्याशा मुलाची ओढ ओळखून, त्याला मदतीचा हात देणारा हाच खाकी वर्दीतला “खरा हिरो”… जिथे काही पोलीस कर्मचारी नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत पोलिसी खात्याची प्रतिमा मलिन करत आहेत, तिथे आनंद माने नावाच्या एका सजग व कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या छोट्याशा कृतीने माणुसकीची मोठी आठवण करून दिली. त्यांच्या या हृदयस्पर्शी कर्तव्यभावनेमुळे पोलिसांप्रती नागरिकांच्या मनातील विश्वास आणि प्रेम दुणावलं आहे.
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास, माने कर्तव्यावर जात होते. नेहमीप्रमाणेच डोळ्यात सजगतेची चमक आणि चेहऱ्यावर मनापासूनचा साधेपणा घेऊन ते आपल्या दुचाकीवरुन जात होते. तेवढ्यात त्यांना एका बसच्या मागे धावणारा, पाठीवर शाळेची बॅग असलेला लहानसा मुलगा दिसला. घाईघाईने तो त्या बसपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होता; पण बस काही केल्या थांबण्याच्या मनःस्थितीत नव्हती. कुठलाही क्षण न दवडता, माने यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्या मुलाला आवाज देऊन थांबवले आणि त्याला विचारले, “कुठे जायचं आहे?” मुलगा घाबरलेल्या आवाजात म्हणाला, “काका गावाकडे जायचं आहे… हीच शेवटची बस आहे… सुटली तर आई रागावेल!” त्याच्या डोळ्यातील चिंता माने यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या दुचाकीवर बसवले आणि धावत निघालेल्या त्या बसचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांनी ती बस थांबवली व त्या मुलाला सुखरूप बसमध्ये बसवले. मुलाच्या चेहऱ्यावर आलेला हसू, त्याचे आभार मानणारे डोळे आणि आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतील आश्चर्य व कौतुक, हे पाहून माने यांना समाधान मिळाले. या छोट्याशा पण महत्त्वाच्या कृतीमुळे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की, पोलिसांची वर्दी ही केवळ अधिकाराची नाही, तर जबाबदारीची आणि माणुसकीची आहे. माने यांनी दाखवलेली दयाळुता आणि तत्परता नागरिकांच्या मनात पोलिसांविषयीचा आदर आणि प्रेम अधिक दुणावणारी ठरली आहे. मात्र हे दृश्य पाहताना अनेक नागरिकांच्या मनात एक विचार नक्कीच डोकावून गेला – “पोलिसांचं खरं रूप असंच असायला हवं!” कारण काही दिवसांपूर्वीच मलकापूरमधील आरसीपी पथकातील एका कर्मचाऱ्याने सर्वसामान्य नागरिकांशी उद्धटपणाने व शिवीगाळ करत वागणूक दिली होती. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली जात होती. पण अशा सकारात्मक कृतीमुळे माने यांनी पोलिस खात्याच्या मान-सन्मानाला नवा चेहरा दिला आहे. या प्रसंगावर काही नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून समाधान व्यक्त केले असून, “असे पोलीस जर प्रत्येक ठिकाणी असतील, तर खरोखरच समाज सुरक्षित राहील,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळेच आजही सामान्य माणसाच्या मनात खाकी वर्दीबद्दलचा आदर जिवंत आहे. पोलिस दलात आनंद मानेसारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.