Headlines

सर्वस्व राख होऊन गेलं… शेगोकार कुटुंबाचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं; घर, गोठा जळून खाक – एक बैल ठार, दुसरा मरणासन्न – शेगोकार शेतकरी कुटुंब उघड्यावर, तालुक्यातील भाडगणी येथील घटना

मलकापूर ( दिपक इटणारे ):- “आमचं काही उरलं नाही… घर गेलं, पशू गेले, संसार उघड्यावर आला.” अश्रूंना वाट मोकळी करत शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार आपली व्यथा मांडत होते. भाङगणी येथील त्यांच्या शेतमालावर लागलेल्या भीषण आगीत तेव्हा सगळंच जळून खाक झालं. घर, गोठा, अन्नधान्य आणि एक जीव… सर्व काही या आगीत लोपलं.
भर दुपारी लागलेल्या आगीने एवढं रौद्ररूप घेतलं की काही क्षणात घराचं अस्तित्वच नाहीसं झालं. गोठ्यात बांधलेला एक बैल आगीत होरपळून ठार झाला, तर दुसरा गंभीर अवस्थेत जीवाशी झुंज देतोय. घरात साठवलेलं गहू, हरभरा, तूर, उडीदसारखं धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि आयुष्यभराच्या कष्टांचा ठेवा – काहीच उरलं नाही. त्या क्षणी जगन्नाथ शेगोकार शेतात लहान मुलासोबत होते. पत्नी आणि मोठा मुलगा गावाबाहेर गेले होते. आगीची झळ पोहचण्याआधी शेजाऱ्यांनी धाव घेतली खरी, पण तोपर्यंत सर्वस्व राखेत परावर्तित झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी व कोतवाल यांनी पंचनामा केला. जखमी बैलावर उपचार सुरू आहेत. पण मनाने कोलमडलेल्या शेगोकार कुटुंबासाठी ही जखम खोल आहे – जी फक्त औषधांनी भरून येणार नाही.
“शासनाने आधार द्यावा, ही गरज नाही तर हक्काची मागणी आहे,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. कारण या आगीत फक्त संपत्ती नाही, तर एक कुटुंबाचं आश्रय, विश्वास आणि आयुष्यही जळून गेलं आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!